मोदींच्या विजयाची कारणे- भाग १
२०१९ सालच्या सतराव्या लोकसभेचे निकाल हाती आले. सत्ताधारी भाजप
पक्षाला तब्बल ३०३ जागा मिळाल्या. एकूणच राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा आकडा ३५३
पर्यंत गेला. २०१४ पेक्षा एकट्या भाजपच्या ३१ जागा वाढल्या. राष्ट्रीय आणि स्थानिक
अश्या सगळ्याच पातळीवरच्या लोकांनी गेल्या ६ महिन्यात वर्तवलेल्या अंदाजापेक्षा हा
निकाल एकदमच वेगळा निघाला. म्हणूनच कि काय राज ठाकरेंनी ह्या निकालाचं
"अनाकलनीय" असं वर्णन केलं. म्हणूनच ह्या विजयाचं विश्लेषण महत्वाचं
ठरतं. देशपातळीवरचे सर्वच पत्रकार मोदी सरकार गेल्यातच जमा आहे, जमिनीवर
वस्तुस्थिती दिसते आहे आणि सरकार जाणं ही केवळ औपचारिकता आहे असं सांगून टाकलेलं
असताना मोदी हे पुन्हा गेल्यावेळपेक्षा अधिक मताधिक्क्यानी निवडून येतात ही
सामान्य गोष्ट नाही. मोदींच्या विजयाची काही ठळक कारणं आपण बघू
१. स्वतः मोदी
मोदी ही व्यक्ती आजवर कोणालाच समजलेली नाही हे ह्या निकालावरून
स्पष्ट होतं. ही निवडणूक केवळ मोदी ह्या नावाभोवती फिरत राहिली. मोदींची हीच इच्छा
होती. आणि ही इच्छा त्यांच्या समर्थकांपेक्षा देखील त्यांच्या विरोधकांनी पूर्ण
केली. मोदींच्या राष्ट्रीय पातळीवरील आगमनानंतर देशात ज्या ज्या निवडणुका झाल्या
त्यात मुद्दा केवळ मोदी हाच होता. अगदी महापालिकेच्या निवडणुकांमध्ये असं दिसून
आलं कि लोकांना नगरसेवकाचं नाव माहिती नाही, परंतु
केवळ मोदींसाठी भाजपला मतदान केलं. ह्या
निवडणुकीत देखील काँग्रेस आणि इतर पक्षांचे उमेदवार म्हणत होते आमची लढाई इथल्या
उमेदवारांशी नसून थेट मोदींशी आहे. विरोधकांनी
एक प्रचार केला होता कि मोदींना सक्षम विरोधी चेहरा नाही म्हणून मोदी जिंकतात.
परंतु त्यांच्या उमेदवारांची वक्तव्य ऐकली तर त्यात अजिबात तथ्य नाही असं दिसून
येत. स्वतः मोदींनी देखील मोदी हवा का नको एवढंच विचारलं, मोदी हवा का राहुल/मायावती/अखिलेश असले प्रश्न त्यांनी देखील विचारले
नाहीत. देशातल्या तमाम समाजवादी विचारवंतांना आणि पत्रकारांना मोदी आजवर समजले
नाहीत आणि समजणार पण नाहीत. मोदी जाळं टाकतात आणि हे लोक अलगद त्यात येतात. कधी
कधी तर हे लोक आधी बसतात आणि मग मोदींना जाळं टाकायला सांगतात.
मोदी हे १८ तास काम करतात. आजवरच्या इतिहासात कुठल्याच पंतप्रधानांनी
एकही सुट्टी न घेता दररोज एवढं काम केल्याचं ऐकिवात नाही. त्यांच्या परदेश
दौऱ्यावर एकीकडे टीका होत असताना मोदी मात्र रात्री प्रवास करून वेळ कसा वाचेल हे
बघतात. जनता हे सर्व बघत असते. मोदी स्वतःच्या कुटुंबाच्या फायद्यासाठी काही करत
नाहीत हे दिसत असतं. त्यामुळे निर्णय योग्य असो वा अयोग्य असो त्यांच्या
चारित्र्यावर कोणालाच शंका नाही. म्हणूनच राहुल म्हणाले की आम्ही मोदींची प्रतिमा डागाळणार.
आणि इथेच ते चुकले. मोदींवर जेव्हा जेव्हा वैयक्तिक हल्ले झाले आहेत त्या प्रत्येक
वेळी मोदींनी मोठी उसळी मारली आहे. एकेकाळी
क्रमशः

Good one...👍..शब्दांकन छानच..
ReplyDelete